twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

भाग - 5️⃣3️⃣8️⃣

*👩🏻‍💻दिप्तीचे यश:जीवन संघर्षाची फलश्रुती!*

      आमच्या हिंगणगांवची दिप्ती बाबुराव सगरे ही जगातील एक नंतरच्या शेती बियाणे आणि औषध कंपनी Bayer Crop Science.या कंपनीची एक्झिक्युटिव्ह (Genetic purity) झाली आहे, या कंपनीचे मुख्य कार्यालय जर्मनीची राजधानी बर्लिन येथे आहे!
     यापूर्वी ती Sr.Project Associate Co. म्हणून International Rice Research (IRR) Ha.Manila Philippines, South Ashia Hub, Hyderabad येथे होती.
         यापूर्वी तिने तांदळाचे एक वाण विकसित केले होते, तिचा तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब यांच्या हस्ते सन्मानित केले होते. दिप्ती जात्याच हुषार, कल्पक आणि चिकित्सक!तिचे वडील बी.आर.सगरे म्हणजे संघर्षाचे दुसरे नाव!आणि मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन दिप्ती, स्वाती आणि धिरज ही वडिलांच्या संघर्षाची गोड फळे आहेत. दुर्दैवाने हे यश पहायला आज बी.आर.म्हणजे आमचे भाऊ नाहीत!
        मी गावातील बहुतेक घराघरात नात्यापलिकडे संबंध ठेवून आहे आणि ते टिकवून ठेवले आहेत. दुष्काळामुळे अनेकांच्या आयुष्याची माती झाली, अनेकांचे प्रपंच उध्वस्त झाले, अनेकांच्या प्रतिभा जळून खाक झाल्या!या सर्व नैसर्गिक संकटांवर हिमतीने मात करून मुले शिकवली!फक्त शिकवलीच नाहीत तर संस्कारक्षम केली!हे सोपे नव्हते पण आव्हाने पेलण्याची नैसर्गिक शक्ती भाऊंमध्ये होती, त्याचे फळ आज बघायला मिळत आहे!दिप्ती उत्तम संशोधक आहेच पण तिची फार मोठी स्वप्ने आहेत, ती सर्व स्वप्ने ती निश्चितपणे साकारणार आहे!
       तिच्या यशाचे आमच्या गावाला कौतुक आहे, आम्हाला तिचा अभिमान वाटतो, आम्ही हिंगणगांवर परिवाराला खूप आनंद झाला आहे!तिच्या उज्वल भविष्यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा!

💐💐💐💐💐💐💐💐
👍👍👍👍👍👍👍

      🖋️महादेव माळी सर, हिंगणगांव, ता.कवठेमहांकाळ
      मोबाईल नंबर---9923624545

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग -*  5️⃣3️⃣7️⃣

*लिहावे नेटके*

_वाचनापासून  लेखनापर्यंतच्या  प्रवासाविषयीचे काही अनुभव सांगणारा "लिहावे नेटके" डॉ.वसंतराव काळपांडे यांचा 'सोहन' या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख._

*📝लिहावे नेटके*
-
१९५६मध्ये मी पहिलीत गेलो. मला शाळेत जायच्या आधीपासूनच वाचायला  खूप आवडायचे. जे जे मिळेल ते मी अधाशासारखे वाचून काढत असे.   त्या काळात किराणा माल रद्दीत घेतलेल्या वर्तमानपत्रांच्या कागदांच्या पुड्यांतून मिळायचा. घरी आल्यानंतर वर्तमानपत्राचे तुकडेसुद्धा मी वाचत असे. चांदोबामधील विक्रम आणि वेताळ, काशाचा किल्ला, अशा अद्भुतरम्य कथांनी मुलांना त्या काळात वेडच लावले होते. याशिवाय अंगठ्याएवढा राजपुत्र, जादूचे बूट, उडणारी सतरंजी, अशी छोटेखानी पुस्तकेसुद्धा मुलांची खूपच आवडती होती. पाठ्यपुस्तकांतील कविता वर्गात शिकवण्याबरोबरच चालींसह पाठ करून घेण्यावर त्या काळात शिक्षकांचा भर असायचा. त्यामुळेच आजही पहिलीपासून अकरावीपर्यंतच्या अनेक कविता माझ्या तोंडपाठ आहेत.

पहिली ते चौथीपर्यंत मी बुलढाणा जिल्हयातील खामगाव नगरपरिषदेच्या सहा नंबरच्या शाळेत शिकलो. सहा नंबरमध्ये भारंबे सर मुलांच्या अवांतर वाचनाबाबत खूपच आग्रही असायचे. पाचवी ते आठवी मी अमरावतीच्या ‘सायन्सकोअर’, तर पुढे अकरावीपर्यंत ‘कलानिकेतन’ या सरकारी शाळांमध्ये शिकलो. ‘सायन्सकोअर’मध्ये शिकत असताना आम्ही मधल्या सुटीत शाळेच्या वाचनालयात बसत असू. तेथे मुलांसाठी ‘मुलांचे मासिक’, ‘शालापत्रिका’, ‘कुमार’, ‘फुलबाग’, सृष्टिज्ञान, अशी अनेक मासिके ठेवलेली असायची. वर्गवाचनालयाचीही सोय होती. गो. नी. दांडेकर, भा. रा. भागवत, नाथमाधव, हे त्यावेळचे माझे आवडते लेखक. अनेक इंग्रजी पुस्तकांची मराठी भाषांतरेही मी त्या काळात वाचली.

कलानिकेतनमध्ये भैयासाहेब निंबेकर आम्हाला शारीरिक शिक्षण शिकवायचे. त्यांच्याकडे ग्रंथालयाचाही कार्यभार होता. त्यांनी मला कोणतीही पुस्तके घरी न्यायची परवानगी दिली होती. या काळात मी एका लेखकाची पुस्तके वाचायला सुरवात केली की, त्याची सर्व पुस्तके वाचून काढत असे. त्यामुळे त्या लेखकाची लेखनशैली चांगली कळायची. मुन्शी प्रेमचंद, रामधारी सिंह ‘दिनकर’, मैथिली शरण गुप्त, सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’, सुभद्रा कुमारी चौहान हे हिंदीचे माझे आवडते लेखक आणि कवी होते. विदर्भात त्याकाळात हिंदी-मराठी सरमिसळ मोठ्या प्रमाणात असायची. अनेक मराठी गोष्टींमध्ये पात्रांच्या तोंडी हिंदी संवाद असायचे. या सर्व गोष्टींबद्दल कोणाचाही आक्षेप नसायचा; मराठीवर हिंदीचे आक्रमण झाले अशी तक्रार नसायची. रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकर यांचा माझ्या पिढीची वाचनाची आवड घडवण्यात मोठा वाटा होता. त्यांच्या रहस्यकथा मी याच काळात वाचायला लागलो. अर्थात बाबुराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्या शाळेच्या ग्रंथालयात मिळायच्या नाहीत. अनेकांना घरीसुद्धा त्या पालकांची नजर चुकवून, चोरूनच वाचाव्या लागायच्या. त्यांच्या धनंजय आणि छोटू, झुंजार आणि काळा पहाड या पात्रांनी हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या मनांचा कब्जाच घेतला होता. याच काळात शाळेच्या ग्रंथालयात असलेली विज्ञान आणि गणितावरची अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तके मी वाचून काढली. अनेक शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांच्या जीवनावरील पुस्तके मी याच काळात वाचली. आकाशनिरीक्षणावरील पुस्तके, वेगवेगळ्या नक्षत्रांवरील भारतीय आणि ग्रीक पुराणकथा वाचल्या. भास्कराचार्यांच्या “लीलावती” या ग्रंथाचा मराठी अनुवाद आमच्या शाळेच्या ग्रंथालयात होता. त्यातील प्रश्न सोडवताना खूप मजा वाटायची. “लीलावती”वरून त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीची बऱ्यापैकी कल्पना यायची. मी कोणती पुस्तके वाचावी यांवर शाळेत किंवा घरी कोणतेही बंधन नव्हते. चांगले संस्कार व्हावेत यासाठी दर्जेदार पुस्तकेच वाच, असा आग्रह नव्हता. चांगल्या साहित्याबरोबरच सुमार दर्जाचेही साहित्य मी वाचले. तरीही चांगल्या आणि वाईट साहित्यांतील फरक कळण्यात मला कोणतीच अडचण आली नाही.
*                *                      *
सायन्सकोअरमध्ये कमलताई डांगे आणि कमलताई देशपांडे या दोन शिक्षिका शाळेच्या हस्तलिखिताच्या संपादनात माझी मदत घ्यायच्या. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी काही कथा आणि कविता लिहिल्याही. पण ललितलेखन हा माझा पिंड नाही, हे लवकरच माझ्या लक्षात आले. माझे वाचन भरपूर असले तरी मला पल्लेदार, अलंकारिक भाषेत लिहिणे मला कधी जमायचे नाही. मी बरेचदा मला चांगल्या वाटणाऱ्या लेखकांच्या लेखनशैलीचे अनुकरण करत असे. राम दारव्हेकर सर आम्हांला मराठी शिकवायचे. सुप्रसिद्ध नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे ते लहान भाऊ. एकदा त्यांनी आम्हांला ‘उन्हाळ्याची सुट्टी’ या विषयावर विनोदी निबंध लिहायला सांगितला होता. माझा निबंध वाचल्यानंतर ते म्हणाले होते, “ निबंध छान झाला; पण आपण श्रीपाद कृष्ण कोल्हटकर नाही; वसंत काळपांडे आहोत हे लक्षात ठेवावं.” दारव्हेकर सरांचा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या भाषेत, स्वत:च्या शैलीत लिहिण्यावर भर असायचा. लिखाणात आपण स्वत: दिसायला पाहिजे त्यासाठी स्वत:ची शैली शोधायला हवी असे ते म्हणायचे.

मला माझ्या भाषाशैलीचा शोध लागला तो सरदेशमुख सरांमुळे. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवायचे. साध्या, सरळ, कमीतकमी शब्दांचा वापर असणाऱ्या, ओघवत्या, अनलंकृत आणि आपल्याला जे काही सांगायचे त्याचे स्पष्ट चित्र डोळ्यांपुढे उभे करणाऱ्या भाषाशैलीवर त्यांचा भर होता. पुस्तकातला मजकूर पाठ करून जसाच्या तसा लिहिण्याऐवजी तो स्वत:च्या भाषेत लिहावा आणि भाषेच्या आणि अचूकतेच्या दृष्टीने नऊ वेळा तरी तपासावा अशी त्यांची शिकवण असायची. एखादा विद्यार्थी पुस्तकातील बोजड वाक्ये जशीच्या तशी वापरू लागला तर ते म्हणायचे, “ध्वनी होतो, पण अर्थबोध होत नाही.” सरदेशमुख सर आणि दारव्हेकर सर यांच्यामुळे माझी भाषा घडली. शाळेत असतानाच इंग्रजी पुस्तकांत वाचलेल्या माहितीच्या आधारे मी लिहिलेले विज्ञानावरचे काही लेख ‘अमृत’, ‘श्रीयुत’ आणि ‘नवनीत’ या मराठी डायजेस्टमध्ये छापून यायला लागले होते. महाविद्यालयाच्या वार्षिकात मी पुंज सिद्धांता(Quantum Theory)वर, तसेच मॅक्स प्लँक आणि अर्नेस्ट रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांच्या जीवनांवर मराठीत लेखही लिहिले होते
*                *                      *
पण त्यानंतर वेगळे अनुभव आले. १९७२ मध्ये एम. एससी. झाल्यानंतर मी एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अहमदनगरला १९७३ मध्ये जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालो. १९६४ चा महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६५ पासून लागू झाला असला तरी १९७८ पर्यंत सरकारी पत्रव्यवहार आणि बैठकांमध्ये वापरली जाणारी भाषा प्रामुख्याने इंग्रजी असायची. १९७८ नंतर वसंतदादा पाटील आणि शरद पवार हे मुख्यमंत्री असताना सरकारी कामकाजात मराठीचा वापर खूपच वाढला. त्यानंतरच्या काळात मी काही अहवाल मराठीतून लिहिले. “अहवाल अभ्यासपूर्ण आहे, पण भाषा बोलल्यासारखी वाटते. लेखनात  ‘प्रगल्भ’,  ‘डौलदार’ भाषा असावी लागते.” असे शिक्षण विभागातील अनेक ज्येष्ठ अधिकारी किंवा माझे काही सहकारी मला सांगायचे. अशा वर्णनाची भाषा कशी असते ते मला माहीत होते; पण ती वापरण्याचे कौशल्य मात्र माझ्याकडे नव्हते आणि आजही नाही. अशा अभिप्रायांमुळे माझ्यात काही प्रमाणात का होईना पण न्यूनगंड निर्माण व्हायचा.
*                *                      *
१९८०-८१ मध्ये मी कोल्हापूर विभागाचा शिक्षण उपसंचालक असताना माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचा-यांचा, म्हणजे लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक आणि शिपाई यांचा कार्यभार अजमावून आकृतिबंध ठरवण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षण संचालक वि. वि. चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली होती. मी या समितीचा सदस्य-सचिव होतो. व्यवस्थापन शास्त्रातील कार्यमापन तंत्राचा शास्त्रशुद्ध वापर करून आम्ही निकष ठरवले होते. सगळा अहवाल मीच मराठीत लिहिला. तो चिपळूणकर सरांना दाखवला. सर म्हणाले, “एवढ्या रुक्ष वाटणाऱ्या विषयावर इतका शास्त्रशुद्ध आणि ओघवत्या शैलीतला अहवाल मी पहिल्यांदाच वाचतो आहे.”

“सर, हा अहवाल भाषेच्या दृष्टीनी कोणाला दाखवायचा काय?” मी विचारले. “कशाला?” ते म्हणाले. “भाषा आणखी डौलदार होऊ शकेल.” मी उत्तरलो. ते हसले आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली.

प्रख्यात गायक कै. पंडित वसंतराव देशपांडे यांचे अनेक गुरू होते. एका गुरुंकडून शिक्षण संपवून निरोप घेऊन ते निघताना म्हणाले, “मला तुम्ही तुमच्याकडचं सगळं ज्ञान तुम्ही मला दिलं.” “सगळं नाही दिलं. एक गोष्ट अजून नाही सांगितली. कसं गायचं याचं माझ्याकडे असलेलं खरं गुपित मी तुला अजून सांगितलं नाही.” गुरुजी म्हणाले. पंडितजी आश्चर्याने पाहत राहिले. त्यांचे गुरुजी म्हणाले, “तू जसा बोलतोस तसाच गा. हेच ते गुपित.”

चिपळूणकर सर म्हणाले, “आपल्या सर्वच कामांत अशीच सहजता असली पाहिजे. आपलं लिखाणही तसंच असावं. तुम्ही लिहिलेल्या अहवालात यत्किंचितही बदल करण्याची आवश्यकता नाही. असंच लिहीत जा.” ज्यांच्या कामाबरोबरच, ज्यांच्या भाषणांमुळे आणि लेखनामुळे ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती आणि आजही आहे त्या चिपळूणकर सरांचे हे प्रमाणपत्र मिळताच माझा न्यूनगंड कुठल्याकुठे पळून गेला.

त्यानंतर १९८२ ते १९८५ ही चार वर्षे मी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन या संस्थेत काम केले. महाराष्ट्रात परत आल्यानंतर शैक्षणिक धोरणावर आणि शैक्षणिक प्रशासनावर मराठीत अनेक लेख लिहिले. १९९२मध्ये ‘शालेय प्रशासन आणि मानवी संबंध’ हे माझे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित झाले. मी लिहिलेली त्यापूर्वीची पुस्तके इंग्रजीत होती. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला.
*                *                      *
आजही लिहीत असताना
“जसे बोलतोस, तसेच लिही.”
“लिखाणात आपण स्वत: दिसायला पाहिजे.”
“ध्वनी होतो, पण अर्थबोध होत नाही.”
“लिहिलेला मजकूर नऊ वेळा तरी तपासावा.”
ही चिपळूणकर सर, दारव्हेकर सर आणि सरदेशमुख सर यांची वाक्ये माझ्या कानांत घुमत असतात.

- डॉ. वसंत काळपांडे

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीच्या प्रेरणादायी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या
https://guruvarykm.blogspot.com/?m=1
या ब्लॉगला भेट द्या.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग -*  5️⃣3️⃣6️⃣

 तुम्हीच सांगा झोप कशी येईल ?

*दुर्घटनेनंतर 40 तासांपासून पोकलेन चालवतोय 'किशोर'*

तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले.

By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: August 26, 2020 02:18 PM | Updated: August 26, 2020 03:36 PM

मयूर गलांडे 

मुंबई - २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठा अवाज झाला...आणि हाहाकार माजला... महाड शहरातील तारिक गार्डन इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने काही काळ परिसरात धुळीचे लोट पसरले होते... कानठळ्या बसणाऱ्या स्फोटाप्रमाणे आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांची धावाधाव सुरू झाली... प्रत्यक्ष घराबाहेर पडल्यानंतर कानी पडला तो फक्त...आक्रोश...काळीज धस्स करणारे दृश्य पाहून अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि डोळे विस्फारून पाणावले... भेदरलेल्या नागरिकांना काही काळ काहीच सूचले नाही. डोळ्यासमोर मातीचा डोंगर पाहून मदतीसाठी धावपळ सुरू झाली. याच मदतीसाठीचा एक फोन एल अँड टी कंपनीने ठेका घेतलेल्या पोकलेन मालकाच्या कामगारालाही गेला.  

तारिक गार्डन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर शोध व बचाव पथके ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सोडविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू लागले. त्यांच्या या प्रयत्नांना गती येण्यासाठी माणुसकीला महत्व देत अविरतपणे न थकता, न झोपता अखंडपणे 40 तास पोकलेन चालवण्याचं, काम किशोरने केलंय. बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी गावचा 24 वर्षीय किशोर सध्या महाडमध्ये पोकलँड चालविण्याचे काम करतो. 24 तारखेच्या सायंकाळी ठेकेदाराचा फोन येताच, किशोरने तत्काळ पॉकलेनला चावी देत तारिक गार्डनच्यादिशेने गिअर टाकला. घटनास्थळी पोहोचताच कामाला सुरुवात केली, तब्बल 40 तासांनंतरही त्याचं काम सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढायचंय हे एकच ध्येय त्याच्या डोळ्यासमोर आहे.

आम्ही इमारत कोसळलेल्या जागी पोहचताच काम सुरू केलं, तवापासून माझं काम सुरूचय. सिमेंट-मातीचा ढिग बाजूला सारण्याचं आणि अडकलेल्यानांना अलगदपणे वर काढण्याचं काम मी करतोय. ढिगाऱ्याखाली अडकेल्या माणसांना शोधण्यासाठी पोकलेनचा हँण्डल फिरवताना पोटात गोळा येतो. एखादा माणूस मशिनखाली तर येणार नाही ना, याची काळजी घेत मशिन चालवतोय. कालपासून मी 10 डेडबॉडी ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यात, ते बघून लय वाईट वाटतंय. पण साहेब, काल एका 4 वर्षाच्या पोराला जिंवत बाहेर काढल्यानंतर मला लय भारी वाटलं, आनंद झाला होता. तो मुलगा जिवंत बाहेर आल्याचं पाहिल्यानंतर कामाचा ताणच गेला, उलट पुन्हा जोमात काम करायला लागल्याचं किशोरनं लोकमतशी बोलताना सांगितलं.

तू 40 तास झालं सलग काम करतोय मग, जराही झोपला नाहीस का? असा प्रश्न केल्यावर मराठवाड्याच्या टोनमध्ये, झोपच नाही ना आली साहेब... तुम्हीच सांगा झोप कशी येईल हे असं पाहिल्यावर? असा प्रतिप्रश्न किशोरने केला. किशोरच्या प्रश्नावर मी निरुत्तर होऊन त्याला पुढचा प्रश्न केला. कालपासून जेवण तरी केलं का नाही मग? त्यावर तो उत्तरला. दुपारी समोसा आणि रात्री खिचडी खाल्लीय. साहेब मी कामातंय ओ मला जास्त बोलता नाही येणार असंही तो म्हणाला. त्यानंतर, जास्त काही न विचारता ... थँक्यू किशोर प्राऊड ऑफ यु म्हणून फोन ठेवला. अजूनही पोकलेन चालवण्याचं त्याचं काम सुरूच आहे, ते कदाचित उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत असंच चालू राहिल.  

बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी गावचा 24 वर्षीय किशोर गेल्या 6 वर्षांपासून जेसीबी आणि पोकलेन चालवायचं काम करतोय. गावापासून दूर महाडमध्ये सध्या त्याचं काम सुरुय. मालक सांगेत त्या साईडवर जाऊन काम करावं लागत असल्याचं किशोरनं सांगितलं. किशोर बारावी पास असून बीए फर्स्टला अॅडमिशनही घेतलं होतं. मात्र, कामामुळे जमत नसल्यामुळे परीक्षाच दिली नाही. सध्या ज्या मालकाकडे काम करतो, तो मालक महिन्याला 18 हजार रुपये पगार देत होता, गेल्याच महिन्यात 20 हजार रुपये पगार केल्याचंही त्यानं लोकमतशी बोलताना सांगितलं. किशोरचा फोटो पाहिल्यानंतर त्याचे लालबुंद डोळेच त्याच्या सलग 40 तास कामाची साक्ष देत आहेत. त्यामुळेच, एनडीआरएफच्या जवानांप्रमाणे मला किशोरचं कामही तितकंच निष्ठेचं, माणूसकीचं आणि देशसेवेचं वाटतं.     
    
तारिक गार्डन ही पाचमजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली आणि मोठी दुर्घटना घडली. क्षणात अनेकांचे संसार मातीमोल झाले. इमारत कोसळण्याच्या स्थितीत असतानाच काही जण बाहेर पडले. बाहेर पडताना चिचकर यांचा पुतण्या आवेश आणि इतर तरुणांनी सुरुवातीला २० जणांना बाहेर काढले आणि इमारत कोसळली. या दुर्घटनेत इमारतीमधील ८० जण बचावले असून, १४ मृतदेह काढण्यात आले आहेत. मदत कार्याला वेग आला असून, इमारतीचा पडलेला भराव काढण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफ टीम, पोलीस, प्रशासनाला परिसरातील नागरिक मदत करत आहेत. तर ज्यांच्या नातेवाइकांचा मृत्यू झाला त्यांचे सांत्वन करत आहेत. या संकट प्रसंगी माणुसकी टिकून असल्याचे अनेकांच्या कृतीतून दिसून येत आहे. त्यापैकीच एक आहे, बीड जिल्ह्याच्या एका छोट्याशा खेड्यातील किशोर लोखंडे 

https://m.lokmat.com/mumbai/you-tell-me-how-sleep-teenager-runs-pokland-40-hours-after-mahad-building-accident-a601/?fbclid=IwAR1DecxgcD5dvoOEavSw-ufM6YZPRIdj-tfIVIQyTWtMRdpRa2iKGKEmS2w


📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीच्या प्रेरणादायी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या
https://guruvarykm.blogspot.com/?m=1
या ब्लॉगला भेट द्या.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग -*  5️⃣3️⃣5️⃣

*arjuna award : दोन्ही हात गमावलेले असतानाही अर्जुन पुरस्कार; आता लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक*

Bhimrao Gawali | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Aug 2020, 03:11:00 PM

_काळ्या मातीत राहून नियतीने दिलेल्या अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सुयश जाधवला अर्जुन पुरस्कार मिळाला असून त्याला पुरस्कार मिळाल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे._

साभार - सुनील दिवाण; पंढरपूर: 

   तो बारा वर्षाचा असताना एका लग्नात विजेचा झटका बसला आणि भाजलेले दोन्ही हात गमवावे लागले... वडील क्रीडाशिक्षक त्यामुळे त्यांना सुयशाला एक आंतराराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवायचे होते मात्र दुर्दैवी अपघातात दोन्ही हात गेल्याने त्यांना सुयशचे आयुष्य संपल्यासारखे वाटू लागले... याची जाणीव छोट्याश्या सुयशाला होती आणि याच जिद्दीतून त्याने वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त केले... दोन्ही हात गमावलेले असतानाही बघता बघता जलतरणपटू म्हणून त्याने नावलौकीक कमावला आणि पदकांची कमाईही केली... केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी सुयशाची निवड झाली आणि वडिलांना स्वप्नपूर्तीची खूप मोठी भेट मिळाली. आता सुयशचे लक्ष आहे टोकियो ऑलिम्पिकचे. या स्पर्धेसाठी पात्र होऊन देशासाठी सुवर्ण पदक मिळविण्यासाठी त्याने कठोर परिश्रमाला सुरुवात केली आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/arjuna-award-announced-for-swimmer-suyash-jadhav-from-solapur/articleshow/77702608.cms

करमाळा तालुक्यातील भाळवणी हे एक छोटेसे गाव. याच गावातील नियतीने दोन्ही हात गमवाव्या लागलेल्या सुयश जाधवची ही कहाणी... वडिलांच्या इच्छाशक्तीमुळे फोगट भगिनींनी कुस्तीत इतिहास रचला तशीच कहाणी या सुयश जाधवची आहे. करोनामुळे सध्या शेतात राबणाऱ्या सुयश जाधवला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आणि सोलापूरच्या इतिहासात पहिल्या अर्जुन पुरस्काराची नोंद झाली ती सुयशाच्या रुपाने. पण गावात नाही तर तालुक्यातही अजून कोणाला याबाबत माहितीच नसल्याने जाधव कुटुंब शेतावरील झोपडीत निवांत असलेले पाहायला मिळाले. सुयश जाधव याचे वडील नारायण जाधव हे उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून नावाजलेले, त्यांनी राज्यात व देशात अनेक पुरस्कार मिळविले मात्र परिस्थितीमुळे त्यांना यात करियर करता आले नाही आणि ते वेळापूर येथील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत दाखल झाले. यावेळी त्यांचा लाडका मुलगा सुयशालाही चांगला जलतरणपटू बनवून त्याला देश-विदेशात खेळण्यासाठी साऱ्या सोयी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न त्यांनी पहिले. मात्र नियतीला हे मान्य नव्हते आणि २००४ साली विजेचा झटका बसून सुशांतचे दोन्ही हात तोडावे लागले. आता पोहणे सोडा पण त्याने जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर असतानाच एकदा हात गमावल्यावर त्याला सफाईदारपणे पोहताना वडिलांनी पहिले आणि त्याच्यावर मेहनत घेण्यास सुरुवात केली. राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार असो, एकलव्य पुरस्कार असो सुयश एकापाठोपाठ एक पुरस्कार आणि पदके मिळावीत गेला. दोन्ही हात गमावल्यानंतर सुयशने राज्य स्तरावर ५० सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर ३७ सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ सुवर्ण पदकांसह आजवर १११ पदकांची कमाई केली आहे. २०१६ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयशने देशासाठी पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळवीत मोठा सन्मान मिळवून दिला होता. ही त्याची कामगिरी पाहून भारत सरकारने सुयशाला यंदाचा अर्जुन पुरस्कार जाहीर करीत त्याच्या जिद्दीला आणि कष्टाला सन्मानित केले आहे.

सध्या करोनामुळे पुणे येथे क्रीडाधिकारी पदावर कार्यरत असणारा सुयश आपल्या शेतातील झोपडीत कुटुंबासमवेत राहतोय. सकाळी उठल्यापासून शेतात वडिलांसोबत काम करणे आणि नियमित व्यायाम या दोनच गोष्टी त्याला सध्या करता येत आहेत. याचठिकाणी त्याला अर्जुन पुरस्कार मिळाल्याची बातमीही समजली आणि कुटुंब या आनंदात हरवून गेले. वडिलांनी पेढा भरावीत आपल्या स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त केला तर सुयशने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवत त्यांच्या जिद्दीला वंदन केले. पाण्यासोबत गट्टी जमलेला सुयश गेल्या ५ महिन्यापासून टँक व जिम बंद असल्याने पोहण्यापासून दूर गेला आहे. यातच त्याला टोकियो ऑलिम्पिक मध्ये देशाला सुवर्ण मिळवायचे स्वप्न खुणावू लागले आहे. अशावेळी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ६ स्वीमरना दुबईत जाऊन ट्रेनिंगची सोय केली आहे. त्याच पद्धतीने ३ पॅरा स्वीमरसाठीही दुबईमध्ये पोहण्याची सोय करण्याची मागणी सुयशने केली असून यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाची सर्वोत्तम कामगिरी होईल अशी अपेक्षा सुयश व्यक्त करतोय.

सोलापूर जिल्ह्यात जाहीर झालेला हा पहिलाच अर्जुन पुरस्कार असून २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते याचे वितरण केले जाणार आहे. काळ्या मातीत राहून नियतीने दिलेल्या अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सुयशला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. अपंगत्वाचा बाऊ करण्यापेक्षा आपल्यात कोणत्या प्रतिभा आहेत त्याला वाव दिल्यास जीवनात हमखास यश मिळते असा संदेश सुयश आपल्या इतर अपंग बांधवाना देऊ इच्छितो.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीच्या प्रेरणादायी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या
https://guruvarykm.blogspot.com/?m=1
या ब्लॉगला भेट द्या.